नमस्कार मित्र मैत्रिणींनो, प्रेम आणि कर्तव्य यांच्यापैकी कुणा एकाचीच निवड करायची असेल तर अशा वेळी आपण काय करावं? खांडेकरांची क्रौंचवध वाचताना नेमका हाच प्रश्न प्रत्येक प्रसंगानंतर मला पडत गेला. आणि आज मी तुम्हाला याच कादंबरीबद्दलचा माझा अनुभव नि अभिप्राय सांगणार आहे. हि कादंबरी अशी आहे ना कि म्हटली तर प्रेमकथा, म्हटली तर कर्तव्याची गाथा, पण कादंबरी वाचल्यावर वाचकांचे आपसूकच दोन गट पडतात यात वाद नाही. कुणाला वाटत यातली प्रेम कहाणी सफल व्हायला हवी होती. तर कुणाला वाटत नायकाने त्याच कर्तव्य पूर्ण केले तेच योग्य होत. शेवटी कोण योग्य नि कोण अयोग्य हेच आज मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे. मी मनापासून प्रयत्न केलाय तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करते. तुमचे अभिप्राय नक्की कळवा.
हि कादंबरी ज्यांच्याभोवती फिरते अशी दोन मुख्य पात्र म्हणजे दिनकर आणि सुलु. सुलु एका ध्येयवादी, बुद्धीने विचार करणाऱ्या माणसाची भावनिक, हळवी आणि संवेदनशील मुलगी. भाऊ-बहीण नसल्याने तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या दिनकरलाच ती सर्वस्व मानते. ज्यावेळी तिची आई हे जग सोडून जाते, तेव्हा तिला सर्वात जास्त गरज असते ती तिच्या वडिलांच्या आधाराची. पण बुद्धिवादी वडील भावनेला महत्व न देता मनाची शांती मिळवण्यासाठी सुलूला एकटी सोडून स्वतः एकांतात राहणे पसंत करतात. अशा वेळी तिला आधार देतो तो दिनकर. अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींमधून तिचा दिनकरवरचा विश्वास वाढत जातो. दिनकर तिच्यासाठी तीच सर्वस्व होतो. एका गाईचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झालेला राजा दिलीप, रघूच्या दुसऱ्या सर्गातली हि दिलीप राजाची कथा वाचताना सुलु कळत-नकळत त्या राजामध्ये दिनकरला पाहते, नि म्हणूनच दिनकरच नाव ती दिलीप ठेवते. जगासाठी असलेला दिनकर हा तिच्यासाठी दिलीप होतो.
पण विरह नसला तर ते प्रेम कसलं असं म्हणतात. असाच एक विरह त्या दोघांच्याही वाटेला येतो. ज्यामध्ये दोघांच्याही वाटा वेगळ्या होऊन जातात. त्यांचं प्रेम हे अव्यक्तच राहत. पण कदाचीत नियतीला हे मंजूर नसावं. सुलूच लग्न होऊन जेव्हा ती सासरी येते तेव्हा तीच सासर नि दिनकरच गाव एकच असल्याचं तिच्या लक्षात येत. दुरावलेल्या वाटा पुन्हा जुळतात पण यावेळी दोघंही आपल्या आयुष्याच्या वाटेवरून बरीच पुढे चालून आलेली असतात. सुलु तिच्या संसाराच्या कर्तव्यांशी बांधली गेलेली असते तर दिनकर भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरलेला असतो. पण या सर्वातही सुलूच्या मनात दिनकर विषयी आपुलकी, माया, जिव्हाळा लपलेला असतो. तर दिनकरच्या मनात चालू असते ओढाताण. दोन नात्यांची ओढाताण. एकीकडे प्रेम तर एकीकडे कर्तव्य. सुलूविषयी असणार अव्यक्त प्रेम त्याला एकीकडे खुणावत असत तर दुसरीकडे भारतमातेची हाक त्याला बोलवत असते. दोन नात्यांच्या या द्वंद्व युद्धात विजय एकाच नात्याचा होणार असंही राहून राहून त्याला वाटत असत. दोघांच्याही मनात प्रेम आणि कर्तव्य या नात्यांचं युद्ध चालू असलं तरी दोघांसाठी या नात्यांची व्याख्या मात्र खूप निराळी असते. सुलूच्या मनात दिनकरविषयी असणार प्रेम, त्याची वाटणारी काळजी आणि नवऱ्याप्रती असणार तीच कर्तव्य यांची ओढाताण तर दिनकरच्या मनात सुलूविषयी असणार अबोल प्रेम तर दुसरीकडे मातृभूमीबद्दल असणार कर्तव्य असं द्वंद्व. आणि दोन नात्यांचा हा प्रवास मला उलगडला तो एका निराळ्याच वळणावर.
दिनकरच्या मनात असलेलं सुलूबद्दलच प्रेम त्यानं शेवटपर्यंत तिच्याजवळ व्यक्त केलंच नाही. खूप जणांना याच वाईट वाटलं, अगदी मला सुद्धा एका क्षणापर्यंत हेच वाटत होत कि त्यांची प्रेम कहाणी सफल व्हावी, पण त्यामागे असलेली दिनकरची भूमिका लक्षात घेतली तर माझ्या खुज्या विचारांची मलाच लाज वाटली. भावनेला, पहिल्या प्रेमाला नि त्या प्रेमाच्या सफलतेला महत्व देणारे आपण आणि प्रेयसीच्या प्रेमापेक्षा ज्या भारतमातेला आपली जास्त गरज होती तिच्यासाठी प्राणार्पण करायला निघालेला दिनकर यामध्ये दिनकरच श्रेष्ठ ठरतो यात वाद नाही. पण असा त्याग करायला सुद्धा खूप मोठं मन, खूप मोठे विचार लागतात कदाचित हि आपल्यासारख्या सामान्य माणसांना जमणारी गोष्ट नाहीच. म्हटलं तर दिनकरला त्याच प्रेम व्यक्त करता आलं असत, सुलुशी लग्न देखील करता आलं असत. पण त्यानं तेव्हा विचार केला मातृभूमीचा, पारतंत्र्यात अडकून पडलेल्या त्याच्या बंधू-भगिनींचा. आपली परिस्थिती याहून निराळी नाही, आज जरा कुठे अन्याय झाला तर आपण काय करतो? TV वर बातम्या पाहून हळहळ व्यक्त करतो, whatsap वर, fb timeline वर post share करतो नि बस! आपलं कर्तव्य संपल्यात जमा करतो. आपल्यामध्ये १०० मधून एखादाच असा असतो जो या अन्यायाविरुद्ध लढतो, नि तोच दिनकरच आजच रूप आहे.
क्रौंचवध मधलाच एक छोटासा प्रसंग चार शब्दात सांगतेय तुम्हाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांची सभा घ्यायचं ठरत. ज्यांचा नेता दिनकर असतो. त्या सभेत काहीतरी घातपात होणार अशी बातमी पसरते नि त्यात दिनकरला मारणार असल्याची वार्ता सुलूपर्यंत येते. दिनकर ला वाचवण्यासाठी सुलु ती आजारी असल्याचं सांगून दिनकरला भेटण्यासाठी घरी बोलावते, दिनकर तिच्या काळजीनं तिला भेटायला येतोही, पण सभेत दंगा व्हायचा तो होतोच. दंग्याच्या वेळेस दिनकर सुलूजवळ असला तरी हि गोष्ट सुलु, तिचा नवरा, आणि दिनकर यांनाच ठाऊक असते. बाकी कुणालाही हि गोष्ट माहित नसल्याने दिनकर वर सभा उधळवून दंगा पसरवल्याचा आरोप करतात नि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. दिनकर निर्दोष असूनही फक्त सुलूची बदनामी टाळण्यासाठी तो गप्प बसतो. इतकी सहनशक्ती, आपल्या प्रेमावर बदनामीचे डाग पडू नयेत म्हणून केलेला त्याग केवळ अवर्णनीय आहे. मूळ क्रौंचवधाची कथा नि खांडेकरांनी मांडलेल्या दिनकराची कथा यात मला निश्चितच खूप साम्य आढळलं. क्रौंच पक्षाचे एक जोडपे झाडावर प्रेमालाप करीत बसलेले असते, पण एक भिल्ल येऊन त्यातल्या नरावर बाणाचा हल्ला करतो नि त्यात नर मृत्युमुखी पडतो. आपल्या जोडीदाराला गमावल्याचे दुःख सहन न होऊन मादी तिथेच आक्रोश सुरु करते. तिचा तो आक्रोश पाहूनच कि काय वाल्मिकी ऋषींना शोक अनावर होतो नि त्यांचा शोक एका श्लोकाच्या माध्यमातून प्रकट होतो. हि क्रौंचवध कथा नि दिनकरची कथा अगदी समरूप वाटली मला.
खांडेकरांनी त्या वेळी दाखवलेली समाजातील विषमता आजही आढळते. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळालं तरीही. आपल्या छोट्याश्या जगात सुखी असणारे जीव, म्हणजे आपला गरीब-मध्यमवर्गीय समाज. ज्यांच्या जीवनाकडून अपेक्षाही काही फार मोठ्या नसतात. पण काही सत्ताधारी लोकांना ते हि बघवत नाही. ते या ना त्या मार्गाने गरीब लोकांची अजून पिळवणूक करत राहतात. फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतात नि स्वतःसाठीच जगतात, त्यांचं जग स्वतःच्या पलीकडे नसतंच. गरीब अजून गरीब होत जातात तर श्रीमंत अजून श्रीमंत. नि मग अशा अत्याचारांना कंटाळून कोणीतरी एक दिनकर या सर्वांविरुद्ध लढायला उभा राहतो. त्या वाल्मिकींच प्रतीक म्हणजेच दिनकर, फरक इतकाच कि वाल्मिकींनी शस्त्र न उचलता भिल्लाला शाप दिला, तर दिनकर सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढायला उभा राहिला. दिनकरन ज्या पद्धतींनी गरीब लोकांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्या अडचणी जाणल्या, त्या पद्धतीनं जर आपण आज एकमेकांना समजून घेतलं तर एक निराळच जग तयार होईल. ज्यात जातीवाद, भेदभाव, गरीब-श्रीमंती नसेल. माणसाला माणुसकीच्या नजरेतून पाहता येईल. तो मरणाला घाबरला नाही कारण त्याला माहित होत त्याच्या मरणानं समाजात बदल घडून आला असता. क्रांतीची पूजा अश्रूंनी नाही तर भक्ताच्या रक्तानी करावी लागते. त्यातूनच नवे युग जन्माला येते. जस झाडाच्या फांद्या तोडल्या कि ते अधिक झपाट्याने वाढू लागते तसंच. जर वाल्मिकींसारखे महान ऋषी एका निष्पाप पाखराची हत्या बघून आपल्या साऱ्या तपश्चर्येवर पाणी सोडायला तयार होतात, तर आपली मन का मेली आहेत? आपण तर माणसं आहोत साधी. असे हजारो क्रौंचवध आपल्या आजूबाजूला होत असतात. आपल्यातल्या वाल्मिकीला पण आपण जाग करूयात ना! नि जे काही समाजाचं देणं लागतो ते देऊयात. नुसते गप्प बसून अन्याय सहन करण्यात काहीच अर्थ नाही, उद्या असं म्हणायची वेळ येऊ नये कि या स्वातंत्र्यापेक्षा ते पारतंत्र्य चांगलं होत.
अश्रू, शब्द आणि रक्त या सर्वांचा जन्म माणसांपासूनच होतो पण तिघांचेही मार्ग वेगळे असतात, नि त्यातूनच माणसाची माणुसकी ठरते. जो अन्याय सहन करून मूक अश्रू गाळतो तो भावनाशील माणूस, त्याची माणुसकी भावनेतून जन्म घेते नि भावनेतच मृत्यू पावते. जो सर्व काही बघून फक्त स्वतःची मत मांडतो त्याची माणुसकी बोलण्यात नि मत मांडण्यात व्यर्थ जाते. नि तिसरा प्रकार जो मनुष्य अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, अगदी लढून स्वतःचे रक्त सांडवायला तयार होतो तो खरा माणूस. ज्यांनी माणुसकी घडवून आणली, अशी माणसं फार कमी उरलीयत जगात. म्हणतात ना माणसे जन्माला येतात पण माणुसकी घडवावी लागते, त्रिवार सत्य आहे हे.
सरतेशेवटी सर्वांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर देतेय, कि कोण योग्य नि कोण अयोग्य प्रेम कि कर्तव्य? मला तर इतकंच वाटत कि सर्वजण आपल्या आपल्या जागी योग्य आहेत. दिनकरन त्याच कर्तव्य पूर्ण करूनच समाजात बदलावं आणला. सुलून तिच्या प्रेमाप्रती निष्ठा दाखवून दिनकरचा जीव वाचवला. दोघंही आपल्या जागी योग्यच आहेत, बरोबर आहेत. कारण काही काही प्रेमकथा अपूर्ण राहूनच अजरामर होतात. नि काही काही कर्तव्य पूर्ण होऊनच नवीन समाज घडवतात. आपल्याला जगायची प्रेरणा देतात. अधुरी प्रेमकहाणी असलेली पण कर्तव्यपूर्तीनं आपल्याला भारून टाकणारी, आपल्यात एक सामाजिक बदल घडवून आणणारी कादंबरी. सर्वानी अवश्य वाचावी अशी दिनकरची- आजच्या युगातल्या वाल्मिकीची कथा "क्रौंचवध".
© वृषाली